मैत्री दिनाच्या शुभेच्छा 🙏


खरतरं...वय वाढलं तसे..अनेक आयुष्यात गोष्ठी बदलत जातात...
प्रत्येक नात बदलत जातं....
आज मैत्री विषयावर थोडास लिहावं म्हणलं पण....प्रकर्षाने जाणवून आले ते मैत्रीचे बदलले स्वरूप...वाचायला थोडस कटू वाटेल पण....पण ..खर सत्य मांडण्याचा प्रयत्न...

एक काळ होता, जेव्हा मैत्रीचा अर्थ होता 
शाळेच्या तासात मागच्या बाकावर खोड्या करणं ,हसणं खिदळण,
एकाच डब्यात मिळून जेवणं,छोट्याशा गोष्टीसाठीही एकमेकांसाठी धावत जाणं.
तीच मैत्री कॉलेजमध्ये गेल्यावर थोडीशी समजूतदार होते,
स्वरूप तेच, पण थोडं परिपक्व...बिनधास्त भटकंती,
आणि हो कोणालाही न सांगता शेअर केलेल्या काही खास भावना देखील...
तेव्हा ‘मैत्री’ हा शब्द केवळ नातं नव्हतं,
तर होती एक आपुलकीची साथ जी मनाशी घट्ट जोडलेली होती.

पण आता?

आजच्या सोशल मीडियाच्या झगमगाटात मैत्री online झाली आहे...
'Active' दिसतो/दिसते तेव्हा मनात येतं 
एक मेसेज करावा का?
पण लगेचच दुसरा विचार 
तोच/तीच का नाही करत मला msg?
मग थोडासा आपलाही ego वर डोक काढतो...
पूर्वी नजरेतून उमजणारी ती नाती,
आज reaction वरून मोजावी लागतात...
"story पाहिली, पण reply नाही दिला..."
"status टाकलाय, पण काहीच बोललं नाही?"
वेळेअभावी आजची मैत्री फक्त व्हॉट्सअॅपच्या Like वर निभावली जाते.फेसबुकवर birthday wish टाकून
"आपण अजूनही जवळ आहोत ,मित्र आहोत हे " असं दाखवलं जातं...
कधी काळी दिवसाचे १० तास एकत्र घालवणारे
आज फक्त forwarded wishes मध्ये "connected" राहतात.
मैत्रीचा ठसा फक्त DP change, tag, आणि memory post मध्ये उरतो.
आजही संवाद असतो, पण तोही अधुरा…भावनांचा स्पर्श नसलेला.
आणि तरीही मन कुठेतरी त्या जुन्या मैत्रीला शोधत असतं.

कधी अचानक एक “Hi” येतो… 
हृदय धडधडतं…
आठवणींच्या झऱ्यात नकळत ओलावा दाटतो…
क्षणभर वाटतं "सगळं तसंच आहे अजून!"
पण लगेचच पुढे संवाद थांबल्याने ,त्या शांततेत हरवतं सगळं कारण,
वेळ नसतो, किंवा priority बदललेली असते.
आयुष्याच्या वाटा वेगळ्या झालेल्या असतात.

कधी कधी वाटतं त्या जुन्या रस्त्यावर पुन्हा एकदा चालावं,
मनसोक्त बोलावं, पुन्हा एकमेकांच्या डोळ्यांत पाहावं…
पण जबाबदाऱ्या, धावपळ या सगळ्या गोष्टी त्यात अडथळा येतात.
आता मित्रांचा आवाज आता फक्त voice note मध्ये ऐकू येतो,
हसणं, रुसणं, समजून घेणं सगळंच virtual झालंय.
पण...
मनात कुठेतरी अजूनही ती ओढ आहे 
फक्त एकदा भेटावं, online नव्हे, तर heart-to-heart बोलावं.
जुन्या फोटोमध्ये दिसणारे चेहरे बदलले असतील,
पण आठवणी? 
त्या आजही ताज्या आहेत ,मैत्री या online जगात हरवत चालली असली, तरी ती पूर्ण संपलेली नसतेच कधी.....
कारण ती मनात, त्या ‘last seen’ पेक्षाही खोल कुठेतरी जिवंत असते.

आज त्या एका मैत्रीसाठी सुरुवात स्वतःपासूनच करा....
थोडासा वेळ काढा,
आलाच फोन समोरून तर फोन उचला,
आणि फक्त एवढंच म्हणा 
 दिवस पूर्वीचे राहिले नसले तरी....आजही आपली मैत्री मनात घर करून आहे...
आणि मैत्रीदिनाच्या शुभेच्छा द्यायला विसरू नका!!
पाहा ,दुसऱ्या बाजूने येणारा आवाजही
तितकाच ओळखीचा आणि हृदयाला भिडणारा असेल, आपुलकीचा, गहिरा, आणि कायमचा!

मैत्री दिनाच्या आभाळभर शुभेच्छा !!!
@सोनाली कुलकर्णी 

#Friendshipday #मैत्रीदिन #मैत्रीदिनविषेश
(लेख आवडल्यास शेअर नक्की करा पण नाव डिलिट करू नका🙏)

प्रेम असच असत ना...

आणि मग,
त्या कुशीत विसावलेल्या क्षणांना
असतो फक्त आपला श्वास…

तुझ्या केसांतील सुगंध
हळूच माझ्या काळजात घर करतो,
प्रत्येक लहर,
तुझं अस्तित्व माझ्यात रुजवत जाते...

त्या शांत श्वासांत
मी तुला जपतो,
तुझं मूक हास्य,
मनाच्या कोपऱ्यांत गूंजत राहते...

प्रेमाचं नातं असंच असतं ना...
शब्दांशिवाय सांगतं सारं...
हातात हात गुंफून,
आपण मात्र ,
चालत राहतो एकमेकांच्या विश्वात...
श्वासांच्याही पलीकडे...
एकमेकांचे होऊन...
@सोनाली कुलकर्णी 
इंस्टाग्राम @spandankavitaa

#त्याच्यानजरेतून

 #प्रेम #followers #तुझमाझंनात #explorepage #exploremore #followme #ShareThisPost #loveislove
माझ्या आयुष्याचा 7/12


तुझ्या नावावर माझ्या आयुष्याचा ७/१२ केला,
तेव्हा असं वाटलं की ,
माझं सारं काही तुझ्या अस्तित्वात विलीन झालं…
आता आपल्या घराची भक्कम भिंत तू,
आणि त्या भिंतीवर दररोज पडणारा निवांत प्रकाशही तूच,
मी तुझ्या सावलीत स्वतःलाच हरवत गेलेय 
तुझ्या प्रेमात पूर्णपणे विरघळून गेलेय...

हे आपल नातं मालकी हक्काचं कागदोपत्र नाही,
तर विश्वासाच्या साक्षीवर निशब्द, पण शाश्वत वचन आहे.
आता तुझं नाव माझ्या नावाच्या शेजारी ठळकपणे उठून दिसतं,
आणि माझं अस्तित्व एका सुंदर सहीसारखं अधोरेखित झालयं 

तुझ्यासोबत चालताना मी तुला सगळ दिलं...
माझे शब्द, माझे स्वप्न , माझं मीपणही…
आता उरला आहे तो म्हणजे
तुझ्या श्वासात मिसळलेला माझा श्वास...
प्रत्येक क्षणात तो मला पुन्हा तुझ्याजवळ घेऊन येतो ,
आपल्या प्रेमाच्या अंगणात दररोज,
नवं एखादं गीत बनतं,
अगदी
सुंदर , निस्सीम, अनंत...♥️
@सोनाली कुलकर्णी 

#प्रेम #आयुष्याचा_७/१२ #followers #लग्नानंतरच_प्रेम #marriedcouple #marriedlife
दिव्यांची अमावास्या आणि गोड कणकेचे दिवे कसे बनवायचे रेसिपी
आषाढी एकादशी झाली की वेध लागतात ते दीप अमावास्या येण्याचे...
त्या दिवशी .. दिव्यांची पूजा संध्याकाळी झाली की आई आम्हाला ओवळायची आणि आजी बाबांना ओवाळायची आणि गोड कणकेच्या पिठाचे दिवे नेवैद्य म्हणून खायला द्यायची.

खरतरं काही संस्कार हे लहान वयातच घरातून होत असतात...
आजी प्रत्येक सणावाराला जे काही करायची, ते का आणि कशासाठी करते हे सगळं ती आम्हाला समजावून सांगायची. 
तेव्हाही आजीकडे चातुर्मासाचे पुस्तक होते. त्या पुस्तकातील प्रत्येक सणाची कथा ती आम्हाला वाचून दाखवायची आणि त्याबद्दल माहिती द्यायची. आजी आता नसली तरी तिची आठवण मात्र आजही येते.😌

उद्या दीप अमावस्या आहे, म्हणून मला आठवले की एकदा मी आजीला विचारले होते, 'घरात इतके दिवे असताना हे पिठाचे दिवे कशाला करतेस?'
आजीने म्हणाली होती, 'गोड पिठाचे दिवे (कणकेचे दिवे) म्हणजे घरच गव्हाचे पीठ, तूप, गूळ अशा शुद्ध, सात्विक गोष्टी वापरून आपण तयार करतो. ते नुसते दिवे प्रकाशित करत नाही तर ते आपण देवाला नैवेद्य रूपात अर्पण करतो. या गोड पिठाच्या दिव्यांतून प्रेम, श्रद्धा, आदर आणि भक्तीची भावना व्यक्त होते.'

हे गोड पीठाचे दिवे बनवणं खूप सोपं आहे.. 
• अर्धी वाटी गूळ थोड्याशा पाण्यात गरम करून विरघळवून घ्यायचा.गुळ विरघळला की हे गुळाचे पाणी थंड करण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचे. 

• 1 वाटी गहू पीठ घेऊन त्यात वेलची पावडर ,आवडत असल्यास जायफळ पावडर ,चिमूटभर मीठ घालायचे
 नंतर त्यात गरम दोन चमचा तूप गरम करून तुपाचे मोहन पिठावर घालायचे आणि पिठाला हे तूप चांगले चोळून घ्यायचे म्हणजे, म्हणजे पीठ मऊ होते. 

•सगळ छान मिक्स करून झाले की मग त्यात थोडं थोडं गुळाचं पाणी घालून घट्टसर कणिक मळावी.मळलेली कणिक 10 मिन झाकून ठेवायची म्हणजे कणिक छान मुरते.
• मळलेल्या पिठाचे लिंबाच्या आकाराचे गोळे तयार करून  त्यांना दिव्याचा आकार द्यायचा 
• उकड पात्राला तूप लावून तयार केलेले दिवे अंतर ठेवून थोड्या थोड्या अंतरावर ठेवायचे कारण वाफवल्यानंतर ते थोडे फुगतात . 
दिवे मध्यम आचेवर १२-१५ मिनिटे वाफवून घ्यायचे.

वाफवलेले गरम गरम दिवे तयार झाले की जेव्हा आपण घरातील सगळ्या दिव्यांची पूजा करतो तेव्हा हेही दिवे देवासमोर नैवेद्य म्हणून अर्पण करायचे. प्रत्येक दिव्यात थोडे साजूक तूप आणि फुलवाती घालून ते प्रज्वलित करायचे नंतर हे दिवे प्रसाद म्हणून खायला द्यायचे.  "साजूक तूप आणि गूळ घालून केलेल्या या दिव्यांची चव खूपच छान लागते."

 म्हणूनच दीप अमावस्येला दिव्यांची पूजा करण्याची  परंपरा म्हणजे केवळ दिव्यांची पूजा नाही, तर प्रकाशाचं महत्त्व ओळखून अंध:कारावर विजय साजरा करणं आहे. घरातील सगळ्या दिव्यांना स्वच्छ करून त्या दिव्यांची पूजा करणं म्हणजे घरातील प्रत्येक दिव्याला मान देणं, त्यांचं पूजन करणं,  त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन  श्रावण महिन्याला पवित्र सुरुवात होतेय

उद्या प्रत्येकाच्या घरी दिव्यांची पूजा होईल सगळ्यांची घरं पुन्हा एकदा उजळून निघतील... सकारात्मकतेने दिशेने!

'दीप सूर्याग्निरूपस्त्वं तेजस: तेज उत्तमम ।
 गृहाणं मत्कृतां पूजा सर्व कामप्रदो भव:॥'

@सोनाली कुलकर्णी 

#दीपअमावास्या #गोडकणकेचेदिवे #followers #deepamawasya 

कणकेचे गोड दिवे कसे बनवायचे?
(टीप : प्रत्येकाची पद्धत वेगळी असू शकते मी माझी मांडण्याचा प्रयत्न केला आहे)
पातळ पोह्याचे दडपे पोहे
आज बऱ्याच दिवसांनी कर्नाटक पद्धतीने पातळ पोह्याचे दडपे पोहे केले..
खरतरं जसा गाव , भाग, राज्य बदलेल तश्या पदार्थांच्या करण्याच्या पद्धती बदलत जातात. तसेच बायकांच्या आयुष्यात सगळ्यात मोठा लग्न झाल्यानंतरचा बदल म्हणजे सासरची पद्धत आणि माहेरची पद्धत...यामध्येच नक्कीच होत.
माहेरी जाड पोह्याचे दडपे पोहे आई बनवायची  त्यामुळे मला तीच पाककृती माहित होती पण सासूबाईंची पध्दत वेगळी...जी खरतर मला खूप आवडली सुद्धा आणि सोईस्कर वाटलीसुद्धा...

तर सांगते.... कर्नाटक पद्धतीने पातळ पोह्याचे दडपे पोहे कसे करायचे ते....

• पातळ पोहे चाळून घेऊन त्यावर चवीनुसार 
लाल मिरची पावडर(तिखट) , मिठ ,चवीनुसार साखर , मेतकूट घालून घ्यायचे.
•त्यानंतर फोडणी करून घ्यायची.
फोडणी मध्ये
तेल ,तेलात मोहरी जिरे,हिंग हळद ,शेंगदाणे , डाळ ,कडीपत्ता घालून खमंग फोडणी करून घ्यायची.आणि ती थंड करून घ्यायची.(या फोडणीमध्ये भाजलेले शेंगदाणे घातले तर अजून टेस्टी लागतात)
•फोडणी थंड झाली की ती पाळत पोह्यांवर घालायची.
आणि पोहे छान हाताने mix करून घ्यायचे.
हाताने mix केले की प्रत्येक पोह्याला तिखट मीठ साखर आणि फोडणी लागते.
याला आमच्याकडे पोहे लावून ठेवणं म्हणतात..😄
आम्ही असे एकदम अर्धा किलो पोहे लावून ठेवतो आणि जेव्हा हवे असेल तेव्हां नंतर दडपून दडपे पोहे करतो.असे केल्याने गडबडीच्या वेळी खूप सोप पडत. फोडणी करण्यापासून सगळ करत बसावं लागत नाही.खूप वेळ वाचतो.

आता दडपे पोहे बनण्यासाठी..
(जर लावलेले पोहे 4 वाटी घेतल्या तर त्याप्रमाणे पुढील साहित्य)
ओल्या नारळाचा चव अर्धी वाटी, काकडी खिसलेली अर्धी वाटी,  एक कांदा ,एक टोमॅटो बारीक चिरून घालायचे, 
आणि हे पोह्यांवर घालून लिंबू पिळायला ,कोथिंबीर घालायची.(मोठा लिंबू असेल तर अर्धा पिळला तरी पुरेसा होतो)
आता पोह्यामधे घातलेले सगळे जिन्नस हाताने छान mix करून घ्यायचे आणि झाकण ठेवून पोहे दडपून 5 मिन ठेवायचे.

हे दडपे पोहे करताना यामध्ये कुठेही पाणी वापरले नाहीये.
कारण ओला नारळ, काकडी ,टोमॅटो, कांदा यामध्ये ओलसरपणा म्हणजेच पाण्याचा अंश असतोच.... त्यामुळे पोहे आपोआप मऊ होतात आणि सर्व चवी पोह्यांमध्ये मुरतात.

5 मिन नंतर ...ह्या दडप्या पोह्यांवर वरून  अगदी थोडेसे ओल खोबरे ,कोथिंबीर घालून सर्व्ह करावे.
कुणाकुणाला खोबर चालत नाही काकडी चालत नाही तर  ह्या गोष्टी स्किप करून तुम्ही फक्त कांदा टोमॅटो घालू शकता

माझ्या माहेरी दडपे पोहे करण्याची वेगळी पद्धत होती तिथे...सगळ्या गोष्टी घालून झाल्या की वरून फोडणी दिली जाते.
पण ही पद्धत सासूबाईकडून मी शिकले.

जेव्हा सण वार असतो तेव्हा आमच्याकडे हमकास नाश्त्यासाठी हे असे दडपे पोहे बनवले जातात , सण असले की घरी कांदा खात नाही त्यामुळे त्यात फक्त  कांदा घातलेला नसतो.

परवा मी मेथीची रेसिपी टाकली होती त्यावर इतक्या वेगवेगळ्या रेसिपीज मैत्रिणींनी सांगितल्या की मेथीच्या भाजीवर एक पुस्तक निघेल😍 व्हरायटी मध्ये recipes नवीन कळल्या.
आपल्या सगळ्याच मैत्रिणी खूप सुगरण आहेत...❤️

तुमच्याकडे तुम्ही कसे बनवता दडपे पोहे हे नक्की कॉमेंट करून सांगा ..
@सोनाली कुलकर्णी 

She Plans Dinner 

#recipeoftheday #recipe #explorarpage #दडपेपोहे #highlight #follower
🌈इंद्रधनुष्य 😍


आज खूप वर्षानंतर इंद्रधनुष्य पाहिला मी...
अगदी माझ्या घराच्या गॅलरीतून दिसत होता.... तो ही दुहेरी इंद्रधनुष्य...😍😍 
एकाच वेळी 2 इंद्रधनुष्य दिसल्याचा आनंद मनात ओसंडून वाहत होता. लहान असताना जशी इंद्रधनुष्य बद्दल कुतूहलता होती ती अगदी आजही अनुभवली....
अचानक समोर इंद्रधनुष्य दिसताच.....मुलाला हाक मारून Rainbow ,Rainbow म्हणायला विसरले नाहीच मी...

आकाशाच्या कॅनव्हासवर इंद्रधनुष्याचे सप्तरंग उमटले की, एक अद्भुत दृश्य तयार होते. क्षणभरासाठी का होईना, पण ते रंग आपल्या डोळ्यांना आणि मनाला एक वेगळीच ऊर्जा , आनंद देऊन जातात. 

इंद्रधनुष्याचे सप्तरंग पाहताना सहज एक विचार मनात आला,
"हे सप्तरंग आपल्याला नेमकं काय शिकवतात?"
प्रत्येक रंगाचं एक वेगळं अस्तित्व आहे आणि ते उठूनही दिसते.
तसंच आपल्या आयुष्यातही विविध भावभावनांचे, प्रसंगांचे, अनुभवांचे रंग असतातच की, 
कधी सुखाचे,आनंदाचे, कधी दुःखाचे, कधी प्रेमाचे, कधी विरहाचे ,कधी यातनाचे ...
इंद्रधनुष्याचे सप्तरंग आपल्याला शिकवतात,
आयुष्य हे एकट्या एका रंगाचं नसतं,
तर ते असतं अशा अनेक रंगांची संगतीने बनलेले..
प्रत्येक रंग स्वीकारा, त्याचा सन्मान करा,
कारण प्रत्येक क्षणातून काहीतरी शिकण्यासारखं असतं, काहीतरी मिळवण्यासारखं असतं.
शेवटी काय...?
हीच रंगांची जादू आयुष्याला अर्थपूर्ण आणि सुंदर बनवते, नाही का...? 😊
@सोनाली कुलकर्णी 
Instagram@spandankavitaa 

#इंद्रधनुष्य #Rainbow #सहज_सुचलं_म्हणून #follower 
#todaysclick
नात्यात आपण समोरच्या व्यक्तीला गृहीत धरतो तेव्हा

आपल्या आयुष्यात काही माणसं अशी असतात, ज्यांच्याशिवाय आपण आपल्या जीवनाची कल्पनाही करू शकत नाही. आई-वडील, भावंडं, नवरा,सासरची मंडळी अगदी जवळचे मित्र-मैत्रिणी ही नाती आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग असतात. त्यांच्यावर आपलं खूप प्रेम असतं आणि तसेच त्यांचेही आपल्यावर प्रेम असतं. पण कधी कधी, याच प्रेमाच्या नात्यात नकळतपणे एक चूक आपल्याकडून नियमित घडत असते ती म्हणजे आपण त्यांना गृहीत धरतो.

समोरच्या व्यक्तीने आपल्याला गृहीत धरले की आपल्याला त्याचा त्रास वाटतो,चिडचिड होते कधीकधी खूप रागही येतो...
पण..आपणही कुणाला तरी गृहीत धरत असतोच की...
खरतर "सगळे नियम हे फक्त इतरांसाठी नसतात, आपल्यासाठीही असतात" हे आपण विसरूनच जातो. 
आपल्यालाही वाटतं की ही व्यक्ती आपलीच आहे, ती कुठे जाणार आहे? ती आपल्याला समजून घेईलच की, झालीच आपल्याकडून चुक तर माफ करेलच की आणि याच विचारात आपण कधी कधी त्यांच्या भावनांचा, त्यांच्या अपेक्षांचा किंवा त्यांना काय हवंय याचा विचार करणं सोडून देतो.

गृहीत धरण्याचे अनेक प्रकार असू शकतात.
 कधी आपण त्यांच्या वेळेची कदर करत नाही, कधी समोरच्या व्यक्तीने मदत करेलच असे सहज गृहीत धरतो, 
कधी पटकन काहीतरी बोलून त्यांच्या भावना दुखावतो,हल्ली तर whatsapp वर msg करून सुद्धा मनातला राग व्यक्त करतो ,समोरच्या व्यक्तीच्या भावना दुखावतो आणि एवढ सगळ करून 'ती व्यक्ती आपलीच आहे, समजून घेईल' या विचाराने दुर्लक्षही करतो. 
याचा परिणाम काय होतो? ज्या व्यक्तीवर आपण खूप प्रेम करतो, तिलाच आपल्या या वागण्याने त्रास होतो. हळूहळू, मनात नाराजी निर्माण होते , गरज नसताना दुरावा निर्माण होऊ लागतो आणि कधी कधी तर एकमेकांशी बोलू सुद्धा नये इतकी कटुता निर्माण होऊ शकते.

आपल्याला हे भान ठेवायलाच हवं की, कोणतंही नातं हे गृहीत धरण्यासाठी नसतं. प्रेम आणि आदरानेच ते टिकून राहतं. ज्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो, तिला आदर देणं, तिच्या भावनांचा विचार करणं आणि त्या व्यक्तीला सुद्धा आपल्याकडून काय हवे ते समजून घेणं हे आपलं कर्तव्य आहे. 

तिच्या असण्याला महत्त्व देणं, तिने केलेल्या गोष्टींची कदर करणं आणि वेळोवेळी आपलं प्रेम व्यक्त करणं हे खूप महत्त्वाचं आहे.
नात्यांमधील ही गृहीत धरण्याची सवय आपल्याला आणि आपल्या प्रिय व्यक्तीला दोघांनाही त्रास देऊ शकते.
 म्हणून कोणतीही गोष्ट करताना, क्षणभर विचार करायला हवा. आपल्या आयुष्यातील त्या खास व्यक्तीला आपण गृहीत धरत तर नाही ना? 
कारण, काही नाती खरोखरच अनमोल असतात आणि ती जपायलाच हवीत.
@सोनाली कुलकर्णी 

#सहज_सुचलं_म्हणून 
#realationshipgoals #नातं #follower #followersシ゚


मेथीची भाजी पुराण..

भाजी कोणती करू म्हणून विचारल्यावर नवऱ्याची फर्माईश आली ...
माझी आई करते तशी मेथीची भाजी कर ग...
Hmmm....
आई करते तशी म्हणण्यावर.....जरा मोठा pause घेऊन म्हणलं...
बरं बरं....करते...

माझी मेथीची भाजी करण्याची पद्धत एकतर पूर्वी पूर्ण वेगळी होती . एकतर मूग डाळ घालून लसूण घालून सुकी हिरव्या मिरचीची फोडणी करून भाजी किंवा मग मेथीची गरगट भाजी मी करायचे...
पण ते असत ना.... आईच्या हाताच्या चवीची सवय असते खाण्याच्या बाबतीत...तीच जरा बायकोने पण शिकली तर बरं होईल असे प्रत्येक नवऱ्याला वाटत असत..
काय करणारं बायकाना शिकावं लावत ...s
बर्याचदा मेथीची भाजी आई कश्या करतात ते पाहील होत मी त्यामुळे...मला आईसारखी भाजी करायला जमेल यात मला शंका नव्हती..आई मेथीची गोळा भाजी बनवतात ,जी अजीबात कोरडी लागत नाही ,डब्याला नेहली तरी खायला एकदम खमंग लागते.

बरं आता तुम्हाला पण रेसिपी सांगुनच टाकते...
सासूबाई कशी बनवतात मेथीची गोळा भाजी...

1मेथीची पेंडी निवडून ,स्वच्छ धुवून घेऊन नंतर ती बारीक चिरून घेऊन..
कढई मध्ये एक चमचा तेल टाकून तेलात चांगली mix करून घ्यायची परतून घ्यायची.. एक मिनिटभर झाकण टाकून भरपूर वाटणारी मेथी वाफेने कमी होते...
मग त्यात थोडस पाणी घालून 2 मिन वाफ द्यायची.
• 2 मिन मेथी शिजली की त्यात .... 2 छोटी आमसूल ,चवीनुसार लाल मिरची पावडर (साधारण दीड चमचा) आणि मीठ चवीनुसार घालायचं....(बाकी कोणताच मसाला नाही घालायचा)

• अगदी थोडेसे पाणी घालून मेथी अजून शिजवून  घ्यायची..

•आता सगळ्यात मोठा twist म्हणजे ह्या भाजीला..
पाव वाटी  शिजवलेली तूरडाळ लागते...
(मेथीची भाजी बनवण्याचा घाट घालण्या अगोदरच कुकरमध्ये तूर डाळ शिजून घ्यावी लागते.....🤣 )

• झालं तिखट मीठ घालून मेथी चांगली शिजली की त्यात ही शिजवलेली तुरडाळ घालायची.
तूरडाळ चांगली घोटून भाजीत एकजीव करून घ्यायची..
परत थोडस पाणी घालून अशी शिजवायची की त्यात थोडस बेसन पीठ घालत की त्याचा गोळा व्हायला हवा...
बऱ्यापैकी पाणी भाजीतले आटले की त्यात 4 चमचे बेसन पीठ घालायचे.आणि पुन्हा बेसन शिजेपर्यंत 2–3 min भाजीला वाफ द्यायची. भाजीचा केला तर मस्त असा गोळा तयार होईल.

झालं भाजी तयार तर झालीय पण तिला आता खमंग बनायचे ...
खमंग बनवण्यासाठी ....
३चमचे तरी तेल घ्यायचं..गरम झाले की त्यात मोहरी ,किंचित जिरे ,हिंग हळद घालायची...आणि त्यानंतर किमान 2 तरी ब्याडगी मिरची फोडणीत घालून खमंग फोडणी करायची.

आणि ही गरम गरम फोडणी लगेच तयार झालेल्या भाजीवर वरून घालायची. छान mix करून गुपचूप जेवताना खावून घ्यायची.

आणि हो सगळ्यात महत्वाचे म्हणजे...
ही अशी भाजी करण्यासाठी तसा वेळ लागतो
तरीही...
नवऱ्याने आई करते तशी कर मेथीभाजी म्हणलं की बीनबोबाटा लवकर उठून करायची.🤣
लवकर होण्यासाठी कुकर मध्ये करायची नाही...कुकर मधे सेम पद्धतीनं भाजी बनवली तरी त्या भाजीची चव वेगळी लागते.. आणि अशी कढई मध्ये वेळ घेऊन केलेल्या भाजीची चव अफलातून लागते.
मेथीमध्ये शिजवलेली तूरडाळ आणि बेसन हे एकत्रीकरण चांगलच लागत.फक्त ही भाजी करताना आमसूल घालायला विसरू नये.... आमसुलने थोडीशी आंबट चव भारी लागते.त्याशिवाय
Byadagi मिरचीची फोडणी खरंच खूप खमंग लागते...

Hmm.. आज म्हणलं मांडाव मेथीभाजीच माझं पुराण तुमच्याकडेही😆
रेसिपी आवडली असेल तर नक्की कॉमेंट करून सांगा...तुम्ही अजून कोणत्या वेगळ्या पद्धतीने मेथीची भाजी बनवता.
आज बनवलीय मेथीची अशीच भाजी...😍
@सोनाली कुलकर्णी

#मेथीचीभाजीपुराण #follwers #exlporepage





नातं नवरा बायको...

सप्तपदी घेऊन अग्निच्या साक्षीने..ज्या नात्यात घट्ट बांधले जातो...ते सुंदर नात....लग्नाच...नवरा बायकोच!

लग्न करणं खुप सोपी गोष्ट आहे....पण ती टिकवणं..फुलवणं..त्याला छान बहर येऊन देणं ही दोघांची जबाबदारी आहे...
लग्नाआधी.....स्वतंत्र असलेले दोघ एका नात्यात बांधले गेले कि.....सुरू होतो तो...अगदी सोपा नाही आणि खुप अवघड पण नाही असा संसाराचा डोलारा सांभाळण्याचा प्रवास...

त्यात दोघांनाही कष्ट करण्याची ताकद,सहनशिलता,सजुदारपणा..तडतोड याची मानसिकता ठेवावीच लागते....कारण म्हणतात ना 
"नवरा बायको दोन चाक असतात.." 
एक बंद पडून किंवा नाराज असून चालतच नाही ..समतोल कायम रहाणे खूप गरजेच आहे.....

आजकाल दोघांनी नोकरी करणं गरजेच आहे.....
दोघांचीपण घर ,मुल,नातेवाईक,नोकरी तारेवरची कसरत सुरु असते...प्रत्येकवेळा पैशाची जुळवाजुळव करणे ,
होमलोनच टेंन्शन,अचानक येणारी आजारण,वयस्कर आई-वडील,मुलांची स्कुल फी.....पाळणाघर...होम मेटेंनन्स ...बापरे बाप सगळा पैशांचा खेळ.....
आणि ह्या तर सगळ्याच गोष्टींची सगळ्यांना सोय करावीच लागते...पण हे सगळं करत असताना....
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट राहुन जाते..."जगणं",
कुंटुंबाला वेळ देण....

...हम्म ह्या सगळ्याच गोष्टींचा नाईलाज आहे..कराव्या तर लागणारच.....पण तरीही....
ती सल प्रत्येकाच्या मनात राहुनच जाते...
सगळे आपआपल्यापरीने जगतात...आणि 
स्वताःलाच असच असत आयुष्य असे समजवत रहातात....
आणि हो हे केल्याशिवाय हा संसाराचा गाढा पुढे ओढलाही जाणार नाही ना....

असच जगायचं...जसा प्रवाह येईल तस...
पण जमेल तेव्हा ,
एकमेंकाना वेळ देऊन,प्रेमाने,आपुलकीने,नात्यातला ओलावा कायम टिकवून,आपण एकमेंकाचे भक्कम आधारच आहोत..आणि शेवटच्या श्वासापर्यंत एक आहोत ही मनात भावना ठेवूनच.
आणि ही दोघांनी एकमेंकाना जाणिव करुन देऊन....शब्द,स्पर्श,डोळे...सगळयाच्या माध्यमातुन.....मग हे प्रेमळ नातं खरच खूप बहरेल,रातराणीच्या सुवासाप्रमाणे चौफेर दरवळेल....आणि त्याचा आंनद अगदी शेवटच्या श्वासापर्यंत टिकेल....!!
स्पंदन@सोनाली कुलकर्णी

#followers #marriedcouple
विठ्ठल पांडुरंग माझा सखा

#पांडुरंग_माझा_सखा

पांडुरंगा, पांडुरंगा...” या गजरात नुसते शब्द नाहीत, तर त्यामागे आहे एक नातं – नातं मैत्रीचं, विश्वासाचं आणि निखळ भक्तीचं. आषाढी एकादशी म्हणजे या नात्याचं पुन्हा एकदा उजळून निघणं.

पांडुरंग म्हणजे केवळ एक देव नाही, तो आहे भक्तांचा सखा. संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव सगळ्यांचाच तो सखाच तर होताच पण त्यांच्या दुःखात सहभागी होणारा, त्यांच्या आनंदात नाचणारा ,आनंद मानणारा. तो आपल्या भक्ताच्या मनात राहतो, त्याच्या मनातली भाषा समजतो.

वारी ही फक्त पंढरपूरची वाट नाही, ती आहे या सख्याच्या भेटीची आस. डोक्यावर तुळशी वृंदावन, हातात टाळ, मुखात नाम 
“विठोबा माझा सखा आहे,” या विश्वासानं वारकरी निघतो.
 पाय दुखतात, अंग थकतं, तरी मन आनंदात असतं. 
कारण त्याला माहित असतं, त्या चंद्रभागेच्या तिरी आपला सखा उभा आहे संकटातही सावलीसारखी साथ देणारा ! 

लहानपणापासूनच हा सखा आपल्याला घरातच भेटत असतो ,कधी आजीच्या कधी आईच्या गोष्टींमधून,
भजनांतून,तर कधी मंदिरातल्या त्या शांत विठ्ठलमूर्तीमधून.
आपलं रडणं असो, हसणं असो, की मनातल्या भावना
सगळं काही त्याला माहित असतं.
पांडुरंग विठू माऊली कधी रागावत नाही,कोणतीच तक्रार करत नाही... फक्त ऐकतो आणि न बोलता सगळं समजून घेतो 
आपल्या जिवलग सख्यासारखा.

आजच्या धकाधकीच्या जीवनातही पांडुरंग आपल्या सोबतच असतो.कधी मंदिरातल्या शांत दर्शनात, कधी मोबाइल स्क्रीनवर दिसणाऱ्या त्याच्या प्रतिमेत.
कधी Spotify, यूट्यूबवर ऐकलेल्या अभंगमालिकेत, जपनामात, की भजनाच्या सुरात…
तो आहेच आपल्या श्वासासारखा, प्रत्येक ठिकाणी आपल्या सोबत प्रत्येक क्षणात.

सखा पांडुरंग म्हणजे श्रद्धेचा ओलावा, विश्वासाचं बळ, आणि न संपणारी साथ. 
आषाढी एकादशीच्या निमित्तानं पुन्हा एकदा त्याला हाक मारायची 
“ विठू माऊली ,सख्या, हात धर! बाकी सर्व तुझ्यावर सोपवलं आहे!”

आषाढी एकादशीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा ☘️🙏
जय हरी विठ्ठल!
जय जय रामकृष्णहरी!
@सोनाली कुलकर्णी 
#पांडुरंग_माझा_सखा 
#aashadhiekadashi #aashadhiwari #विठ्ठल #vitthalrakhumai #vitthalbhakti #vitthalmauli